Thursday, August 16, 2007

पंचांग एक अवलोकन


"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

पंचांगाचा उदय
मानव जसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.