Friday, March 20, 2009

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार
अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )



विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "बोध अंधश्रद्धेचा" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!
नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.

पूर्वेतिहास.
१९९४ च्या अखेरीस " नाडीभविष्य- चक्रावून टाकणारा चमत्कार " या नावाचे अंकवजा पुस्तक श्री. ओकांनी लिहून प्रसिद्ध केले आणि नाडीभविष्याचा जोरदार प्रचार सुरू केला.त्याची प्रत नारळीकरांनाही अभिप्रायासाठी पाठविली. डॉ.नारळीकरांनी त्यावर आपली भूमिका अविश्वासाची आहे असे सकारण सांगून १००० - २००० व्यक्तींचे सॅम्पल घेवून वस्तुनिष्ठतेचे निकष सांभाळून तशी चाचणी होवू शकेल असे सांगितले. बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकात पृष्ठ ८ वर डॉ. जयंत नारळीकरांना लिहीलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ''आपण आपली पट्टी पहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे कार्यबाहुल्यामुळे आपणास ते शक्य नसेल तर आपण आपला अंगठाछाप व इतर माहिती पाठवल्यास आपली पट्टी हुडकून फोटो, वही, कॅसेट पाठवू शकेन.`` याच पत्राची प्रत डॉ. दाभोळकरांना पाठवण्यात आली होती. त्यावर डॉ. दाभोळकरांनी श्री. ओक यांना असे कळवले की १० व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे व इतर आवश्यक माहिती ओकांच्या कडे पाठविण्यात येईल. त्याच्या आधारे व्यक्तींचे शिक्षण, विवाह, संतती अशा निश्चित व तपासण्याजोग्या बाबींची माहिती नाडीग्रंथाद्वारे मिळवून ओकांनी पाठवावी. या पत्राला श्री. ओकांनी ता. ८-४-९५ च्या पत्राद्वारे असे कळवले की या त-हेचे सहकार्य ओक देउ इच्छित नाहीत. दाभोळकरांनी त्यांची माणसे परीक्षणासाठी समक्ष केंद्रात पाठवावीत. डॉ.दाभोळकरांनी श्री. कुंभोजकरांना लिहिलेल्या दि. १५.२.९५ च्या पत्रात नाडीभविष्याला आव्हान दिले. आव्हानाचे स्वरूप असे होते की ज्या कोणाला अशी खात्री वाटत असेल की व्यक्तीच्या अंगठयाचा ठसा, व काही आवश्यक तपशील एवढया सामुग्रीवर त्या व्यक्तीच्या विशिष्ट बाबींचा बिनचूक तपशील नाडीपट्टीतून मिळतो, त्याने इच्छा असल्यास हे आव्हान स्वीकारावे आणि पाच लाख रुपये जिंकावेत. हे आव्हान कोणा एका विशिष्ट व्यक्तीला दिलेले नव्हते. डॉ. दाभोळकरांना ही खात्री वाटत होती की नाडीपट्टीतून अशा त-हेची माहिती मिळणे अशक्य आहे व हे आव्हान कुणीही स्वीकारून जिंकू शकणार नाही. दाभोळकरांना वाटत असलेली खात्री कशी योग्य होती ते या लेखावरून समजेल. या आव्हानामुळे लोकांचे लक्ष या विषयाकडे आकर्षित झाले, पण ओकांचा व त्यांच्या समर्थकांचा तिळपापड झाला. आपला दावा सिद्ध होउ शकणार नाही याची कल्पना ओकांना होतीच, म्हणून तो दावा नाशाबित करण्याची जबाबदारी ते दाभोळकरांच्यावर ढकलू लागले! 'दाभोळकरांनी स्वत: नाडीभविष्याचा अनुभव घेउन मगच काय ते बोलावे' असा घोशा त्यांनी लावला. त्यात त्यांचा कावा असा होता :- समजा, दाभोळकर स्वत: नाडीकेंद्रात जाउन आले व आपल्याला काहीही अनुभव आला नाही असे म्हणू लागले तर ' दाभोळकर पूर्वग्रह-दूषित असल्यामुळे त्यांनी नाडीवाचकाला खरी उत्तरे दिली नसावीत त्यामुळे त्यांना अनुभव आला नाही' असा आरोप करायला ओक मोकळेच रहातात! या दरम्यान, नाडीपट्टीतील कूटलिपी तामीळ भाषिक लोकांना ओळखता येते की नाही याचा उहापोह सुरू झाला. त्यात अगदी परस्पर-विरोधी अभिप्राय मिळाले.
पुष्कळ पत्रापत्री झाली, आरोप-प्रत्यारोप व तोंडी वादविवाद झाले. होता होता, १९९६ च्या किर्लोस्कर दिवाळी अंकात अं. नि. स. चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांचा स्वानुभवावर आधारलेला प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला. नाडीज्योतिषाचे बिंग त्यांनी फोडले होते. त्यानंतर दोन वर्षे सामसूम झाली होती. आता पुन्हा या पुस्तकाच्या रूपाने त्या शिळ्या झालेल्या कढीला ऊत आणायचे ओकांनी ठरवलेले दिसते. अं. नि. स.च्या वतीने त्यावर काही लिहिण्याची आवश्यकता आम्हाला दिसत नाही, परंतु नाडीभविष्यासंबंधाने काही माहिती वाचकांना द्यावी व प्रस्तुत पुस्तकात नाडीभविष्यासंबंधाने केलेल्या विपर्यस्त विधानांचा प्रतिवाद करावा या उद्देशाने हा लेख आम्ही लिहीत आहोत. अं.नि.स.ची या विषयासंबंधीची भूमिकाही यामुळे स्पष्ट होण्यास मदत होईल.
ओकांचा अतिरंजित मतलबी प्रचार.
" नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी अतींद्रिय ज्ञानाच्या सहारयाने लिहून ठेवली आहेत, प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे, इतकेच नव्हे तर त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नांव हे सुद्धा कोरून ठेवलेले आहे," असा धडाकेबाज प्रचार ओकांनी सुरू केला. आम्ही असे ठामपणाने सांगतो की ही भाकिते १६ ते १७ शे वर्षाहून जास्त जुनी असणे शक्य नाही, ती कुणी अतींद्रिय ज्ञानाच्या मदतीने लिहिलेली नसून ज्योतिषशास्त्राच्या मदतीने सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत, व मुख्य म्हणजे पट्टीवर कूटलिपीत नावे असणे केवळ अशक्य आहे. ओकांचा प्रचार विपर्यस्त व केवळ जाहिरातबाजीसाठी चाललेला आहे. आमच्या प्रतिपादनास आधार पुढीलप्रमाणे आहेत:-
१.) नाडीपट्टीतून निघालेल्या कुंडलीसोबत जन्मदिवशीच्या वाराचा सुद्धा उल्लेख असतो. सोम-मंगळादि सात वार खाल्डियन लोकांच्याकडून आपल्याकडे इसवी सन पूर्व सुमारे पाचव्या शतकात आले. त्यापूर्वी आपल्याकडे फक्त तिथ्यांचा उल्लेख करीत असत. ( आधार:- कै. शं. बा. दिक्षित कृत भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास. ) यावरून असे दिसते की नाडीभविष्ये जास्तीत जास्त अडीच हजार वर्षाहून प्राचीन नाहीत.
२.) नाडी ज्योतिषातली भाकिते १२ कांडांत १२ स्थानांच्या फलानुसार विभागलेली असतात. १२ स्थानांचा संबंध बारा राशींशी आहे. राशींची कल्पना ग्रीक ज्योतिषांनी भारतात इसवी सन पूर्व सुमारे तिस या-चौथ्या शतकात आणली. त्यापूर्वी भारतीय ज्योतिषांना मेष-वृषभादि राशी माहीत नव्हत्या. ( पहा: वरील ग्रंथ. ) यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की नाडीभाकिते २३०० वर्षाहून जास्त प्राचीन असणे शक्य नाही.
३.) नाडीपट्टीत निघलेली कुंडली पृच्छकाजवळच्या जन्मकुंडलीशी तंतोतंत जुळते असे नाडीसमर्थक मोट्या कौतुकाने सांगतात. पट्टीत निघालेली कुंडली निरयन राशींवर आधारलेली असते हे उघड आहे. राशींची निरयन गणना १६-१७ शे वर्षापूर्वी भारतात प्रचलित नव्हती, ती इ. स. च्या चौथ्या-पाचव्या शतकानंतर केव्हातरी ज्योतिषांच्या प्रचारात आली असावी. ( ग्रीकांनी व पाश्चात्य देशांनी ही पद्धत स्वीकारलेली नाही. ) यावरून हे उघड दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये १६-१७ शतकाहून जास्त जुनी असणे शक्य नाही.
अतींद्रिय ज्ञानाबद्दल बोलायचे तर, अतींद्रिय ज्ञानी व त्रिकालदर्शी महर्षी कृत-त्रेता-द्वापार युगात होऊन गेले पण कली युगात तसे महर्षी झाले नाहीत असे श्रीमद्भागवत ग्रंथात म्हटले आहे. कली युग सुरू होऊन सुमारे ५००० वर्षे झाली. यावरून दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये सामान्य ज्योतिषांनीच लिहिलेली आहेत. अतींद्रिय ज्ञानाशी त्यांचा काही संबंध नाही.
भाकितांची मूळची संख्या किती ? आजवर जेवढी माणसे जन्मली आणि पुढे जन्मणार आहेत त्या सर्वांची भाकिते लिहिलेल्या पट्ट्या उपलब्ध आहेत, श् असा आचरट प्रचार प्रथम ओकांनी केला, पण तो फारच ऎबसर्ड दिसतो असे कुणीतरी त्यांच्या ध्यानात आणून दिल्यावर ते म्हणू लागले की तसे नाही, जेवढी माणसे भाकित वाचून घ्यायला येणार आहेत तेवढ्याच माणसांच्या पट्ट्या त्या त्रिकालदर्शी महर्षींनी लिहून ठेवल्या आहेत! हा विनोदी खुलासा सुद्धा किती बिनडोकपणाचा आहे हे पुढे येणा-या चर्चेवरून कळेलच.
नाडीपट्टीवर व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे सांगणे ही धंदेवाईक लबाडी आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे हा मूर्खपणा आहे. असे म्हणण्याची कारणे अशी आहेत:-
नाडी-ज्योतिष हा फलज्योतिषाचाच एक प्रकार असला तरी प्रचलित फलज्योतिषात आणि नाडीज्योतिषात एक मूलभूत फरक आहे तो असा की फलज्योतिषातली भाकिते जन्माच्या वेळच्या संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करून वर्तवायची असतात, पण नाडीज्योतिषातली भाकिते राशीचक्राच्या कितव्या अंशाचा कितवा भाग जन्मवेळी उगवत होता याचा विचार करून पूर्वीच कुणीतरी वर्तवून ठेवलेली आहेत! म्हणजे, नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.
नाडी म्हणजे एका पळाचा अवधी. एक पळ म्हणजे २४ सेकंद. एका अहोरात्रात, म्हणजे २४ तासात, ३६०० पळे बसतात. दरेक पळाचे भाकित कुणी वर्तवल्यास एका दिवसाची ३६०० भाकिते तयार हातील. तिकडे आकाशात राशी-चक्राचे जे ३६० अंश असतात त्यांचे प्रत्येकी १० विभाग केल्यास ३६०० विभाग होतात. एकेक विभाग पूर्वेस उगवून वर यायला एक पळ लागते. ( ३६०० पळात म्हणजे २४ तासात राशीचक्राची एक फेरी पुरी होते.) या ३६०० पळांच्या भाकितांची सांगड ३६०० राशी-विभागांशी घातलेली असते. मेष राशीच्या पहिल्या अंशाचा पहिला एकदशांशावा भाग ज्या पळात उगवून वर येतो ते पळ पहिल्या क्रमांकाचे मानून त्याचे भाकित एका पट्टीवर लिहायचे, व याप्रमाणे पुढे अनुक्रमाने ३६०० नाडी-पट्ट्या तयार करून ठेवायच्या. याचा उपयोग कसा केला जातो ते पाहू.
जातकाच्या जन्मवेळी कितव्या राशीचा कितवा क्रमांक उगवत होता ते जन्मकुंडलीवरून समजते. त्या क्रमांकाशी संबंधित नाडीपट्टी काढायची, व तिच्यावर लिहिलेले भाकित तेच त्या जातकाचे भाकित असे समजायचे! नाडी-ज्योतिषाचा संबंध जन्मकुंडलीशी अशा प्रकारे येतो. भूत-भविष्यकथनाची त्याची पद्धत काहीही असो, पण ते कथन फलज्योतिषाप्रमाणे १२ स्थानात किंवा कांडात विभागलेले असते, त्यामुळे या नाडीज्योतिषाला हायब्रिडज्योतिष हे नाव शोभून दिसते. अशी ही नाडी-ज्योतिषाची थोडक्यात थियरी आहे. तिच्यात आवश्यकतेप्रमाणे तिखट-मीठ-मसाला घातला जात असावा. भृगुसंहितेत ज्याप्रमाणे १०-१२ दिवसांच्या अवधीत जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते, त्याच प्रमाणे नाडी-ज्योतिषात तारीख-महिना-वर्ष कोणतेही असो पण विशिष्ट राशी-अंश उगवत असता जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते! डोके ठिकाणावर असलेल्या कोणत्या शहाण्या माणसाला हे पटेल ? पण शहाण्याला वेडे करतील अशा किती तरी कल्पना शेकडो वर्षे या शास्त्रात धुमाकूळ घालीत आहेत. दशापद्धत म्हणजे काय प्रकार आहे हे ज्यांना समजले आहे त्यांना आमचे म्हणणे सहज पटेल.
जन्मवेळ नोंदवण्यासाठी एका पळाचे भाग मोजण्याचे कुठलेही व्यावहारिक साधन पूर्वी उपलब्ध नव्हते म्हणून जन्मवेळ अमुक घटिका अमुक पळे एवढीच नोंदवीत असत. आज सुद्धा जन्म-वेळ कुणी अर्ध्या-पाव मिनिटांची नोंदवत नाहीत कारण ते व्यावहारिक दृष्टया शक्य नसते. म्हणूनच जन्मवेळेत अर्ध्या किंवा पाव पळाची सूक्ष्मता ( अक्युरसी ) आणून नाडी-पट्ट्यांची बेसिक संख्या ३६०० च्या दुप्पट किंवा चौपट करणे निरर्थक आहे. ३६०० हीच बेसिक संख्या व्यवहार्य व म्हणून अपरिहार्य आहे. एकेका पट्टीवरचा मजकूर १२ पट्ट्यांवर विभागून लिहून पट्ट्यांची संख्या जरी ४३२०० इतकी वाढवली असली तरी बेसिक पट्ट्यांची संख्या ३६०० हीच असते.
शुद्ध बिनडोकपणा
या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे. कां ते पहा. जर पट्टयांवर व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, जन्मकुंडली हे सर्व कोरलेले असेल तर तशा ३६०० पट्ट्या फक्त ३६०० गि हाइकांनाच पुरतील. जिथे रोजची १०-१५ गि-हाइके येत आहेत तिथे एवढ्या पट्ट्या एका वर्षातच संपून जातील. मग ही केंद्रे इतकी वर्षे चालली आहेत कशी? त्याच त्याच पट्ट्या वारंवार वापरल्याशिवाय ती चाललेली नाहीत हे उघड आहे, आणि तसे करायचे तर पट्टी वाचत असल्याचे ढोंग करण्यावाचून काय पर्याय आहे? ते ढोंग उघडकीस येऊ नये एवढ्यासाठीच तर कूट लिपीची योजना. झाकली मूठ सव्वा लाखाची!
आणखी एक मुद्दा मांडतो. पृष्ठ १९३ वर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. (आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? हा प्रश्न विचारायचे कारण असे की, याच पानावर ओक म्हणतात की रोज कमीत कमी २०० लोक, असे २००० वर्षांच्या कित्येक शतके आधी(पासून घडत असावे) असा त्यांचा अंदाज आहे. पृष्ठ ८४ वर त्यांनी ८-१० हजार वर्षांच्या प्राचीनतेचा अंदाज दिला आहे. आता हे आकडे घेऊन जर कुणी हिशोब करायला बसला तर बंडलांची संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल, आणि पट्ट्यांची संख्या अब्जांच्या घरात जाईल. एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, अशा शंका डोळस श्रद्धाळू? माणूस सुद्धा घेईल. यावर ओकांचे म्हणणे असे असावे की पट्टयांची संख्या अशी अफाट नसतेच मुळी, मोजकीच असते! पृष्ठ १२१ वर ते म्हणतात 'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ओकांचे हे विधान त्यांच्या बिनधास्त व बिनडोकपणाचे द्योतक आहे. पट्टयांची संख्येने कमी वाटल्या म्हणजे काय ? कशाच्या मानाने कमी वाटल्या ? गि-हाईकांच्या संख्येच्या मानाने कमी वाटल्या असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? म्हणजेच ३६०० ही आम्ही वर काढलेली बेसीक संख्याच बरोबर आहे असेच त्यांना म्हणावयाचे आहे ना. पट्टीवरचा कोरलेला मजकून कोण बदलतो, कसा बदलतो, कधी बदलतो याचा काहीही खुलासा ते करीत नाहीत! ठीक आहे ते नसतील करत तर आम्ही करतो :- गि-हाईकांला नाडीपट्टी वाचून दाखवायचे सोंग करीत असलेला स्वामी वास्तविक स्वत:च्या मनाशी जुळविलेला मजकूर घडाघडा ''वाचत`` असतो! एक गि-हाईक गेल्यावर दुसऱ्या गि-हाईकापुढे पुन्हा तीच पट्टी पण मजकूर वेगळा असे करून वाचण्याचे सोंग जरी त्याने केले तरी हे अजब नाटक कूट लिपी या प्रकारामुळे उघडकीस येणे शक्य नसते. हे सत्य खुद्द ओकांनीच सांगितले आहे म्हणून बरे झाले. ''पट्टीवरचा मजकूर बदलतो`` याचा खरा अर्थ हा असा आहे. या विंग कमांडरांची कमांड फक्त त्यांच्या कल्पनावारूच्या विंगवर आहे पण बुद्धी नाडीकेंद्राकडे गहाण पडली आहे हे मात्र यावरून स्वच्छ दिसते.

अं. नि. स.चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) श्री. पाटील यांना या कुंडलीत काही गम्य नव्हते.
खरा चमत्कार तरी कोणता?
नाडीपट्टीवर कूट लिपीत खरोखरी काय लिहिलेले असते हे निदान मराठी माणसाला कळणे शक्य नसते, नाडी-वाचक म्हणेल ती पूर्वदिशा अशी तिथे स्थिती असते. या संदर्भात आम्ही प्रस्तुत पुस्तकातील पृष्ठ १२ वरील ओकांच्या पत्रातील ओळी उद्धृत करतो: 'आपण पुरवतो ती माहिती तुमचे ताडपत्र हुडकायला मदत करण्यासाठी आहे. तीच माहिती हजारो वर्षापूर्र्वी कूटलिपीत तेही तामीळसारख्या सुदूर प्रदेशातील भाषेत कोरलेली कशी हाच तर चमत्काराचा पाया आहे.' पण हा पायाभूत चमत्कार खरोखरीच घडला आहे की नाही हे ठरवायचे कुणी आणि कशाच्या आधारे ? तामिळी भाषा जाणणा यांच्या साक्षी दोन्ही बाजूकडून काढल्या गेल्या, पण त्या अगदी टोकाच्या विरोधी आहेत. मग यातून मार्ग काय ? ओकांनी ज्या तामीळ-जाणकारांकडून पृष्ठ ४ वरील माहिती मिळवली ते लोक कूट लिपीची मूळाक्षरे आणि कोणत्याही एका अक्षराची बाराखडी तामिळ लिपीत रूपांतरित करू शकतील तर तामीळ अक्षरांचे देवनागरीत रूपांतर कुणीही संस्कृत जाणणारा तामीळ माणूस करू शकेल. अशा रितीने कूट लिपीतील नावांची शहानिशा मराठी माणूस करू शकेल. आम्ही तर असे म्हणतो की ओकांना जर एवढी तळमळ लागली असेल तर त्यांनी त्या कूट लिपीची मूळाक्षरे आणि एका अक्षराची बाराखडी त्यांच्या स्वामींच्या मदतीने देवनागरी लिपीत रूपांतरित करून प्रसिद्ध करावी. संस्कृत जाणणा या दाक्षिणात्य लोकांना देवनागरी लिपी चांगली ठाऊक असते. त्या कूटलिपीतल्या सांकेतिक चिन्हांशी आणि शब्दांच्या सांकेतिक अर्थाशी आम्हाला काही कर्तव्य नाही, ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे म्हणून आम्ही फक्त नावांची शहानिशा करू इच्छितो, आणि ती करण्याचा एवढा एकच मार्ग आम्हाला दिसतो. कूटलिपी हेच जर त्या अगस्त्य नाडी-केंद्राच्या चालकांचे ट्रेड-सीक्रेट असेल तर ते तिची गुरुकिल्ली ओकांच्यासुद्धा हाती लागू देणार नाहीत. जर तसे नसेल तरच ओक ती किल्ली मिळवू शकतील. आमच्यासारख्यांना ही गोष्ट अशक्य आहे हे आम्ही कबूल करतो. नाडीकेंद्रात कुणी जास्त चौकसपणा करीत असल्याचा संशय जरी आला तरी काय होते ते श्रीकांत शहांनी व ओंकार पाटलांनी अनुभवले आहे.( महर्षींचा अपमान केला म्हणून केंद्रातून डच्चू मिळाला नाही हे नशीब! ) आम्ही ओकांना अशी विनंती करतो की ही गुरुकिल्ली त्यांनी मिळवून प्रसिद्ध करावी. तसे केल्याशिवाय 'चमत्कार की धूळफेक ?' या कोड्याचा उलगडा त्यांना व्हायचा नाही. नाडी-पट्टी वाचणारा काय कुठेही बोट ठेवून म्हणेल की हे पहा इथे तुमचे नाव! आमच्या हातात त्या लिपीची मूळाक्षरे असली तरच आम्ही आमची खात्री करून घेऊ शकू. एरवी आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अंगठयाच्या ठशाचा उपयोग नाडीची बंडले शोधण्यात कसा होतो हेही सिक्रिट गुलदस्त्यात! पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते.
ओकांचा हेतू तरी काय ?
श्री. ओकांच्या कल्पना-रंजनावरून कुणाला असे वाटेल की मोठमोठ्या महर्षींच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील शिष्यांचे तांडेच्या तांडे ताडांच्या झावळ्यावर भाकिते कोरून काढण्यातच आपले ज्ञानार्जनाचे तरुण वय वाया घालवीत होते. अब्जावधि पट्ट्या त्यांनी कोरून लिहिल्या असल्या पाहिजेत. असे जर खरोखरीच घडले असेल तर आम्ही म्हणू धन्य ते महर्षी आणि धन्य ते शिष्यगण! आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. आम्हाला पडलेला प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आधीच ठाऊक असलेल्या गोष्टी ताडपट्टीत लिहिलेल्या आहेत एवढे कळल्यामुळे कुणाचे व काय कल्याण होते ? खुद्द ओकांनाच हा संभ्रम पडला आहे हे विशेष! ( पहा: पृष्ठ ८ पॅरा २). नाडीकेंद्राचा अनुभव घेतलेल्या अनेकांना आम्ही विचारले की तिथे गेल्यामुळे तुमचा प्रत्यक्ष असा काय फायदा झाला? काही उत्तर मिळाले नाही. म्हणजे मग हा सगळा उपद्व्याप श्री. ओक कुणासाठी व कशासाठी करीत आहेत हा प्रश्न पडतो. ते नाडी-केंद्रांचे एजंट आहेत असे कुणी म्हणू नये यासाठी पृष्ठ ७९ वर त्यांनी जो निर्वाळा दिला आहे त्यावर समजा आपण विश्वास ठेवला, तरी मूळ प्रश्न शिल्लकच रहातो. आम्हाला असे वाटते की प्रसिद्धीची हाव आणि एक सनसनाटीचा आनंद मिळवणे एवढ्यासाठीच ते हा खटाटोप करीत असावेत. त्यात त्यांचा स्वार्थ नाही! ओकांच्या धडाकेबाज प्रचारामुळे मराठी माणसे अधिक प्रमाणात नाडीभविष्य पहायला जाऊ लागली असे त्यानीच म्हटले आहे, त्यामुळे तिथल्या स्वामीलोकांचे कल्याण नक्कीच झाले असेल. 'होई ना का बापडे, आपले काय जाते ? परिहार-विधी करण्यासाठी मराठी माणसांचे लाखो रुपये खर्च पडले असतील. पडेनात का जाईनात, आपले चार चव्वल थोडेच खर्च होताहेत ?' बहुतेक तटस्थ लोक असाच विचार करीत असावेत, पण अं. नि. स. ला हे पटत नाही. तिच्यावर खार खाणा-यांनी निदान एवढा तरी विचार करावा की तिच्या प्रचार-कार्यामुळे सर्वसामान्यांचे काही नुकसान तर होत नाही ना, - जसे ओकांच्या प्रचारामुळे ते होत आहे.
श्री. ओकांना सध्या एकाच गोष्टीचा निदिध्यास लागला आहे तो म्हणजे : डॉ. दाभोळकर व डॉ. नारळीकर यांनी आपल्या समवेत १०-१२ मित्रमंडळी घेऊन स्वत: नाडी-केंद्रात जाऊन आपल्या आई-वडिलांची नावे, मुलांची नावे, नाडीवाचकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद घ्यावा. पट्टीवरच्या कूटलिपीत खरोखरीच नावे आली आहेत की नाहीत ते त्यांना नाही कळले तरी हरकत नाही, त्यांनी नाडीवाल्या स्वामीवर खुशाल डोळे मिटून विश्वास ठेवावा! शिवाय, ओक तिथे त्यांच्या मदतीला उपस्थित असतीलच ना! डॉ. नारळीकरांच्या सारखा थोर खगोलशास्त्रज्ञ व अं.नि.स.चे डॉ. दाभोळकर एका पोरसवदा स्वामीपुढे नम्रपणे बसले आहेत, त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देत आहेत, हे विलोभनीय दृश्य पहायला ओक आतुर झाले आहेत. असे घडेपर्यंत त्यांना सुखाची झोप लागणार नाही. ओंकार पाटील यांनी जो काय अनुभव घेतला तो ओकांच्या मते खरा नाही किंवा पुरेसा नाही. तो पूर्वग्रह-दूषित आहे. प्रत्येकाने मारुतीच्या बेंबीत ( किंवा आणखी कुठे ) बोट घालून स्वत: अनुभव घेतला पाहिजे असा त्यांचा आणि त्यांचे प्राचार्य मित्र श्री. गळतगे यांचा वैज्ञानिक आग्रह आहे! अं.नि.स.ला तसे करण्याची गरज वाटत नाही.
थोडक्यात,
१. नाडीपट्ट्यांतला मजकूर १६-१७ शतकांहून जास्त जुना नाही.
२. कृत-त्रेता-द्वापार युगातल्या महर्षींचा प्रस्तुत नाडी-ज्योतिषाशी व पट्ट्यातल्या मजकुराशी काही संबंध नाही. कलीयुगात त्रिकालज्ञानी महर्षी झाले नाहीत.
३. प्रस्तुत नाडी-भविष्ये सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत.
४. नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही.
५. अंगठयाचा ठसा हा केवळ देखावा आहे.
६. कूटलिपीची मूळाक्षरे व बाराखडी देवनागरी लिपीत उपलब्ध झाली तर आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळेल इतकेच. वास्तविक, आमचे निष्कर्ष आम्ही स्वतंत्र प्रमाणांच्या मदतीने आधीच काढले आहेत. त्यासाठी तांबारमला भेट देण्याची आम्हाला गरज पडली नाही. नाडीभविष्याला प्रायमा फेसी केसच नाही असे आम्ही का म्हणतो ते वरील मुद्यावरून कळेल.
-------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वप्रकाशित- अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र- एप्रिल १९९९
तसेच उपक्रम या संकेतस्थळावर पहाता येतील.

1 comment:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही...

प्रकाशजी, आपल्या या धाग्यावर नजर गेली. हा आपला लेख जुना आहे. त्यानंतर उपक्रम व अन्य धाग्यांवर तेथील धनंजय व हैयोहैयैयोनी एका नाडी पट्टीच्या फोटोतील लिहिलेले नाव वाचून तसे खरोखर दिसते आहे असे आपले प्रांजळ मत दिले. नाडीपट्टीतील नावांच्या प्रात्याक्षिकाची व्हिडिओ क्लिप भाषणातून दाखवली गेली आहे.नाडीपट्टीत नावे असणे शक्य नाही या निव्वळ तर्काला तो प्रत्यक्ष पुरावा आहे. ते आपल्याला ज्ञात आहे. त्यानंतर त्यावर आपले मत कळलेले नाही. 18 Aug 2012.