Monday, January 23, 2012

शनि मंगळ युती चे बळी ?

आजच्या दै. सकाळ च्या या बातमी कडे लक्ष गेले. बातमीत असे लिहिले की - ज्योतिषशास्त्राच्या आहारी गेलेल्या कुटुंबप्रमुखाने प्रापंचिक नैराश्यायतून आपल्या पत्नीसह दोन मुलांना झोपेच्या गोळ्या देऊन जीवे मारून आणि स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
 शनी-मंगळ युतीचे "भय'
ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या अरुण पालकर यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बायको व मुलांना जीवे मारण्यामागचे कारण स्पष्ट दिले आहे. या चिठ्ठीमध्ये पालकर लिहितात "माझा भविष्यावर विश्वास आहे, मला गोष्टी आधीच कळतात; पण मला कोणी गांभीर्याने घेत नाही. माझे लक्ष संसारात नव्हते. तेरा वर्षांच्या संसारात पैसा, घर, गाडी घेणे मला सोपे होते; पण शनी-मंगळाची युती झाली असल्यामुळे माझी अडचणीकडे वाटचाल सुरू झाली. माझे व पत्नीचे कधीच पटले नाही. माझी मुलं हुशार आहेत; पण त्यांचे हाल नको म्हणून हा मार्ग मी निवडला. पत्नीशी संगनमताने हे पाऊल उचलले आहे.'
याच बातमीला पूरक बातमी म्हणून अरुण पालकरांच्या भावाचे म्हणजे श्री उमेश पालकर यांचे म्हणणे स्वतंत्र दिले आहे ते म्हणतात - "लहानपणापासूनच त्यांना ज्योतिष शास्त्राविषयी आवड होती. ते नववीत शिकत असल्यापासून याविषयातली सर्व पुस्तके वाचत. एखादा माणूस ठराविक कालावधीत कसा वागेल याचे ज्ञान त्यांना होतं. मात्र, ते सगळ्यांनाच याबाबत सांगत नव्हते. मी न सांगता कधी बाहेरगावी गेलो तर त्यांना आपोआप समजायचे आणि ते मला फोन करून विचारायचे."
ज्योतिष समर्थक म्हणतात कि ज्योतिष हे मानवजातीला कल्याणकारक असे शास्त्र आहे.मानवी मनाला दिलासा देणारे शास्त्र आहे. भविष्यात येणार्‍या अडचणींची कल्पना अगोदर आल्यामुळे माणुस संकटाचा सामना करण्यास सिद्ध होतो. वरील बातमीत जातक व ज्योतिषी एकच आहेत. ज्योतिषावर कट्टर श्रद्धा असणारा माणुस देखील असे म्हणेल कि ज्योतिषशास्त्राच्या एवढे आहारी जावयास नको होते. सदर संकट हे ज्योतिष शास्त्रामुळे ओढवलेले नसून अरुण पालकरांच्या नैराश्यामुळे उदभवले आहे.
संकट आले म्हणजे तोडगे परिहार आलेच. तो करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याची बातमी झाली नसती. अगोदरच कर्ज बाजारी त्यातून या तोडग्याचा खर्च. स्वतःसकट कुटुंब संपवण्याचा विचार काही एका रात्रीतुन आला नाही. हे विचार त्यांच्या मनात बराच काळ रेंगाळत असणार. ज्योतिषाच्या आहारी जाण्या ऐवजी त्यांनी जर मानसशास्त्र व समुपदेशन याचा आधार घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. आपल्याला काय वाटते?

1 comment:

Devidas Deshpande said...

कमकुवत मनाची माणसे स्वतःच्या अपयशासाठी कुठल्याही बाबी शोधत असतात. ज्योतिषाने घेतलेल्या अशा बळींची चर्चा होते. मात्र छुप्या पद्धतीने कितीतरी बळी ज्योतिष आणि कुंडल्या घेत असतात. या विषयावर सदानन्दण्डे समयम हा एक अप्रतिम मल्याळम चित्रपट आहे. कधीतरी जरूर पाहा.