Tuesday, August 19, 2008

ज्योतिषांची वर्गवारी

ज्योतिषांची वर्गवारी
पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो. खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.

Sunday, August 10, 2008

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?

ज्योतिषी कुणाला म्हणायचे?
ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते. यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही.

Friday, August 08, 2008

चित्रमय जगत

फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य
फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा."

Tuesday, June 10, 2008

वि. म. दांडेकर

वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो. हा पहा वि म दांडेकरांचा सा.सकाळ मधील ८ जुलै १९८९ चा लेख

Saturday, May 31, 2008

फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: "शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने "फलज्योतिष चिकित्सा" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.
..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे

Tuesday, May 20, 2008

पुण्यातील १९३५ साली फलज्योतिष चाचणीचे आवाहन

रा ज गोखले या भुगोलाचे शिक्षक असलेल्या गृहस्थांनी १९३५ साली लिहिलेल्या "फल्ज्योतिष चिकित्सा" या पुस्तकातील उतारा पहा. त्याकाळी देखील चाचणीचे प्रयत्न झाले होते.

FaljyotishaChikitsa 020
FaljyotishaChikitsa 021a
FaljyotishaChikitsa 021b
FaljyotishaChikitsa 022 a
FaljyotishaChikitsa 022 b

प्रकाश घाटपांडे

Monday, May 19, 2008

फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने

सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी फलज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय चाचणीकरता समस्त ज्योतिषांना केलेल्या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणुकाहि हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणुन ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व.दा. भट यांनी एक १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे श्री श्री भट होते. परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले.

Sunday, May 11, 2008

Press Conference - Astrological Test

पत्रकार परिषदेचा विषय
फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली आहे.याची माहिती डॊ जयंत नारळीकर देतील. या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.

स्थळ:- पत्रकार भवन; सोमवार दि. १२ मे २००८, सकाळी ११ वाजता.
प्रकाश घाटपांडे - समन्वयक
http://faljyotishachikitsa.blogspot.com
भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५

फलज्योतिष -चाचणी चे आवाहन
फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही चाचणी ही प्राथमिक आहे अंतिम नाही.

Thursday, March 27, 2008

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद


ई आवृत्तीच्या निमित्ताने
जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी शिर्षकावर टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे
दि. २८ फेबुवारी २००८

Thursday, August 16, 2007

पंचांग एक अवलोकन


"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

पंचांगाचा उदय
मानव जसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.

Tuesday, June 26, 2007

भारतीय ज्योतिषशास्त्र


ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली

शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत


शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस देखील प्रसिद्धीचे तंत्र उमगल्यामुळे व्यवहारात यशस्वी होतो तर एखादा असामान्य माणूस देखिल प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिल्याने दुर्लक्षित रहातो. पुस्तकांचही तसच आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फलज्योतिष हा विषय मध्यवर्ती घेउन कुणी एखादी विनोदी कादंबरी लिहिली असेल असे कुणाला वाटत नाही.प्रो. नारळीकरांशी एकदा सहज गप्पा मारताना म्हणून या पुस्तकाचा परिचय करुन दिला. त्यांनी ते पुस्तक विमानप्रवासात वाचले. त्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते पुस्तक म्हणजे शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत भाग १ ते ३, लेखक: चिंतामण मोरेश्वर आपटे

Wednesday, May 09, 2007

ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद


भाग १
कुंडली पंचांग राशी नक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय़?२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?३) जन्मकुंडली म्हणजे काय?४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?५)नावावरुन रास कशी काढतात?६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?

काही सामान्य शंका
१४) साडेसाती काय प्रकार आहे?१५) कालसर्प योग म्हणजे काय?१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?१८)ग्रहदशा अंतर्दशा हा काय प्रकार आहे?१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?२०) काही ज्योतिषी आयुष्यातील घटना अचूक सांगतात ते कसे?२१) हिरोशिमा व नागासाकि शहरात अणुबॉंब पडला त्यावेळी लाखो लोक मेले, विमान अपघात. रेल्वे दुर्घटना वा भुकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्युयोग होता असे म्हणायचे का?२२) ज्योतिषांवर दुटप्पीपणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरच दुटप्पी आहेत का?२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतिके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत, डोळ्यांनान दिसणा-या परमेश्वराचे प्रतिक हवे म्हणून माणूस मुर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो.तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले?२४) ग्रहाची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?

विवाह, पत्रिका आणि ज्योतिष
२७)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?२८)विवाह जुळण्याचे वेळी पत्रिका बघावी का?२९)मंगळदोष म्हणजे काय?३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?३१) मृत्यूषडाष्ट्क काय आहे?३२) मुहूर्त पाहणे योग्य कि अयोग्य?३३) गुरुबळ कशासाठी पहातात?३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास का सांगतात?३५) मूळ नक्षत्र सास-यास वाइट,आश्लेशा नक्षत्र सासूस वाइट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?३६) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?

फलज्योतिषाच्या विविध पद्ध्ती
३८) मेदनिय ज्योतिष हा काय प्रकर आहे?३९) राजकिय भाकिते कशी वर्तवली जातात?४०) भुकंपाचे भाकित वर्तवता येणे शक्य आहे काय?४१)भृगूसंहिता हा काय प्रकार आहे?भृगूसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठ्याच्या ठशावरुन तुमचे नाव,तुमच्या बायकोचे नाव,तुमची कुंडली तुमचा वर्तमान काळ,भूत, भविष्य सर्व काही प्राचीन ऋषींनी लिहिलेल्या ताडपट्ट्यावर सापडती ते कसे? याविषयी विंग कमांडर शशीकांत ओक यांनी 'नाडी भविष्य एक चक्रावून टाकणारा चमत्कार' व 'बोध अंधश्रदधेचा' या पुस्तकात स्वतः अनुभव घेउन लिहिले आहे. ते काय खोटे?४४) नॉस्त्रॅडॅमस ने जगाच्या महत्वाच्या घडामोडींचे भाकिते पुर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होइल असे म्हटले आहे.ते खरे आहे काय?४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?४६) वास्तू ज्योतिष काय प्रकार आहे?

फल ज्योतिष शास्त्र? प्रवाद, समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?४८) हे गोकॅलिन चे संशोधन नेमके काय आहे?४९) चंद्र सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृष्य परिणाम होतोच ना! मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकिय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरुन होत नसेल?५०) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित आहे का?५१) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित नाही तर वैद्न्यानिकांनी त्याविरोधी ठोस भुमिका का घेतली नाही?५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे नियतकालिके राशी भविष्य का छापतात?५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही,तरी पण हे शास्त्र भ्रामक आहे हे आम्हास कसे कळावे?५४) राजकारणी, सिनेनट व्यावसयिक हे ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरोपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?५७) मग ज्योतिषाकडे जाणा-या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?५८) दोन तज्न्य डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का५९) विद्न्यान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?६०) फल ज्योतिष विद्न्यान नसेना का पण उपयुक्त तर आहे?६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?६२) परदेशातील फलज्योतिषसंशोधनाची उदाहरणे नेहमीच उगाळली जातात मग आपल्या कडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?६३) आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना काय आव्हाने दिली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?

भाग दोन
स्फुट लेखन

फल ज्योतिषः एक प्राथमिक चिकित्सक दृष्टिकोण
नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष
फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज
यूजीसी आणि फलज्योतिष
फलज्योतिषचिकित्सेविषयी एरिक रेग यांनी संकलीत केलेले पाश्चिमात्य विचार
आखिल भारतीय ज्योतिषसंमेलन, सोलापूर २००१ च्या निमित्ताने

पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी शीर्षकावर टिचकी मारा.

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...जयंत नारळीकर

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........"मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.'
पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.
आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.
मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की "वेटिंग लिस्ट' असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. ""इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?'' माझ्या पत्नीने विचारले. ""त्या "बुक' झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.'' दुकानदार म्हणाला. ""मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!'' माझी कन्या म्हणाली. ""आमची तयारी आहे,'' दुकानदार म्हणाला. ""पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?'' दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या "धाडसी' कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.
"फलज्योतिष हे विज्ञान आहे का?' हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला "अवैज्ञानिक' ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत "हेड' वर, का "टेल' वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही... शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.
फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.
पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः "तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.' "यवन' शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून "इंपोर्टेड' आहे!
खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना "प्लॅनेट' म्हणजे "भटके' हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ "या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,' असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.
पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.
ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.
- जयंत नारळीकर (लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

धोंडोपंत उवाच: ज्योतिषावरून वादंग

धोंडोपंत उवाच: ज्योतिषावरून वादंग

हा ब्लॉग फलज्योतिषाविषयी काही माहिती देतो. या ब्लॉगची सजावट सुंदर आहे.कोकणातील छान फोटो आहेत.

Thursday, October 05, 2006

भांडारकर प्राच्य संशोधन मंदिरातील एक दुर्मीळ Astrolog

आहे काही भविष्याची चिंता?


ही आहे राणी भूभू. पुण्यातील संगमब्रिज परीसरातील भटकी कुत्री. आमच्या सीआयडी कार्यालयाच्या आवारात पडिक असायची. लुळी पांगळी झाली होती. निसर्गानेच तिला बरी केली.तिच्या चेहर्‍यावर मला कधी भविष्याची चिंता दिसली नाही. आहे तो दिवस मजेत काढायचा. बिस्किट हट्टाने आणि हक्काने मागुन घ्यायची.

Monday, September 18, 2006

पुस्तक परिक्षण -प्रो.जयन्त नारळीकर


लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परिक्षण
-----------------------------------------------------------------

अंधश्रद्धांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टि
भारत हा अनेक दृष्टीने वैधर्म्यांचा देश समजला जातो. बैलगाडी पासून जेट विमाने, मातीच्या झोपड्यांपासून गगनचुंबी आलिशान इमारती, वीज आणि पाणी दुर्मिळ असलेल्या खेड्यांपासून रात्रिचा दिवस करु शकणा-या रोषणाईत,खाद्यपेयात पैसा पाण्यासारखा खर्च करणा-या महानगरांपर्यंत मानवी जीवनाची दोन टोके आपण पहातो, पचवतो आणि दृष्टीआड करतो. पण या सर्व वैधर्म्यांइतकेच एक वेगळे वैधर्म्य देशात वाढत आहे.याची आपल्यापैकी बहुतेकांना जाणिवदेखील नसावी.
हे वैधर्म्य म्हणजे वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा यांच्यातले! स्वातंत्र्यपूर्व काळात 'डिस्कव्हरी ऒफ इंडिया' पुस्तक लिहिताना जवाहरलाल नेहरुंनी अशी आशा व्यक्त केली होती, की स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनता केवळा परंपरांचे अंधानुकरण न करता त्यातील युक्तिसंगत सार तेवढे घेईल आणि जीवनातले निर्णय घेताना वस्तुस्थितीची सप्रमाण दखल घेईल. परंतु आज स्वातंत्र्य मिळुन पाच दशके उलटली तरी अंधश्रद्धांचा पगडा होता तसाच आहे- नव्हे वाढतो आहे.असे विदारक दृश्य आज दिसते आहे.

Sunday, September 17, 2006

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी पुस्तक प्रकाशन

Risbud
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... प्रश्नोत्तरातून् सुसंवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी
डावीकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर, कै. माधव रिसबुड (ज्येष्ठ फलज्योतिषचिकित्सक व स्नेही) , वराहमिहिर मुक्त ज्योतिष विद्यापीठाचे नंदकिशोर जकातदार, लेखक प्रकाश घाटपांडे