Monday, October 07, 2013

पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष?

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने  जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-

जन्मलग्न,जन्मकालीन गुरु,सूर्य व राहू यांच्या राशींची बेरीज करावी. त्याला तीनाने भागावे; बाकी शून्य किंवा एक उरला तर पत्रिका मुलाची असते.दोन उरले तर स्त्री ची असते." त्यांनी उदाहरण म्हणुन  इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या पत्रिकेचा ताळ्यासाठी वापर केला आहे.इंदिरा गांधी:- जन्मवेळेस कर्क लग्न + वृश्चिक रवी+ धनु राहू+ वृषभ गुरु महणजे 4+8+9+2=23 23/3 =7 व बाकी 2 उरली म्हणुन स्त्री. संजय गांधी:- मकर लग्न+ वृश्चिक रवी+ धनु राहू + तुला गुरु म्हणजे 10+8+2+7=27 27/3 = 9 बाकी 0. या नियमाची प्रचीती 60 टक्क्याहून अधिक येते असे म्हटले आहे.  या नियमांची छाननी करायची झाली तर पुढे पळवाट सुद्धा आहे. ते म्हणतात," लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते."
वस्तुत: संख्याशास्त्रीय दृष्ट्या यदृच्छेने स्त्री का पुरुष हे ओळखण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भटांनी दाखवलेला नियम हा तपासायचा झाल्यास 'संधी' ची पळवाट आहे, भट म्हणतात कि या नियमाची प्रचीती ६० टक्क्याहून अधिक येते तर त्यांनी काही असा प्रयोग केला आहे का? ज्याची आकडे वारी उपलब्ध आहे का?. २००८ मधे झालेल्या आमच्या फलज्योतिष चाचणीचे वेळी देखील भटांनी चाचणीतील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुधाकर कुंटे यांना भेटून या चाचणीचा पडताळा घ्या असे सांगितले होते. कुंटे सरांनी चाचणीतील डेटा ला तो नियम लावून पाहिला होता. पण त्याचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आढळून आले नाही. हा चाचणीचा अधिकृत भाग नसल्याने तो प्रसिद्ध केला नाही.अथवा त्याची वाच्यता ही झाली नाही.आमच्या खाजगी बैठकीत मात्र याची चर्चा झाली होती.दुर्देवाने कुंटे सरांचे अकाली निधन झाले व तो विषय तिथेच थांबला. इतर ज्योतिषांना देखील भटांचा हा नियम चाचणीसाठी वापरावा असे वाटत नाही. कारण त्याला सार्वत्रिक ज्योतिष मान्यता नाही.फलज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा आग्रह हा इतर ज्योतिषांना पसंत नाही.

No comments: