Monday, September 20, 2021

फलज्योतिष ” शास्त्र? “

 

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच. जीवाजी विद्यापीठ (ग्वाल्हेर), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय (वाराणसी) अशा ठिकाणी तो मानव्यविद्या, प्राच्यविद्या, संस्कृत अशा विषयांतर्गत या ना त्या स्वरूपात अगोदरपासूनच आहे.

Friday, March 26, 2021

भयज्योतिष

 एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते. भविष्यकाळाविषयी सुखद स्वप्ने रंगवणे हा एक मानवी मनाचा खेळ असतो. त्यामुळे जगात बरेचसे व्यवसाय ’भय’ आणि ’स्वप्न’ यावरच चालतात. वैद्यकीय क्षेत्रात आजारी पडण्याचे भय व बरे होण्याचे स्वप्न दाखवून आरोग्य पुरवण्या ’प्रबोधनाचे’ तथा ’जागरुकतेचे’ काम करतात. बिल्डर घराचे स्वप्न दाखवतो. पोलिस,वकील कायद्याचे भय दाखवतात. बॉलिवूड तर अनेकांना हिरो हिरॉईन बनण्याचे स्वप्न दाखवते. लठ्ठ स्त्रियांना झिरो फिगर करण्याचे स्वप्न व सडपातळ स्त्रियांना लठ्ठ होण्याचे भय दाखवून देखील ब्युटी, डाएट, जिम इंडस्ट्रीज चालतात. ज्योतिषात ही तशा प्रकारचे लोक आहेत. कालसर्प योगाचे भय दाखवून नारायण नागबली विधी करायला लावणारे भरपूर पैसे उकळणारे लोक आहेतच. त्याचबरोबर काळजी करु नका कुलदेवतेच स्मरण करा व आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा असे सांगून धीर देणारे ज्योतिषी देखील आहेत. ग्रहपीडेचे भय आणि परिहार वा तोडगा काढून त्याचे निवारण केल्याने चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवून जातकाला दिलासा दिला तर त्यालाही लुबाडल्यासारखे वाटत नाही हे धूर्त व  चाणाक्ष ज्योतिषांना माहित असते.