
लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परिक्षण
-----------------------------------------------------------------
अंधश्रद्धांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टि
भारत हा अनेक दृष्टीने वैधर्म्यांचा देश समजला जातो. बैलगाडी पासून जेट विमाने, मातीच्या झोपड्यांपासून गगनचुंबी आलिशान इमारती, वीज आणि पाणी दुर्मिळ असलेल्या खेड्यांपासून रात्रिचा दिवस करु शकणा-या रोषणाईत,खाद्यपेयात पैसा पाण्यासारखा खर्च करणा-या महानगरांपर्यंत मानवी जीवनाची दोन टोके आपण पहातो, पचवतो आणि दृष्टीआड करतो. पण या सर्व वैधर्म्यांइतकेच एक वेगळे वैधर्म्य देशात वाढत आहे.याची आपल्यापैकी बहुतेकांना जाणिवदेखील नसावी.
हे वैधर्म्य म्हणजे वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा यांच्यातले! स्वातंत्र्यपूर्व काळात 'डिस्कव्हरी ऒफ इंडिया' पुस्तक लिहिताना जवाहरलाल नेहरुंनी अशी आशा व्यक्त केली होती, की स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनता केवळा परंपरांचे अंधानुकरण न करता त्यातील युक्तिसंगत सार तेवढे घेईल आणि जीवनातले निर्णय घेताना वस्तुस्थितीची सप्रमाण दखल घेईल. परंतु आज स्वातंत्र्य मिळुन पाच दशके उलटली तरी अंधश्रद्धांचा पगडा होता तसाच आहे- नव्हे वाढतो आहे.असे विदारक दृश्य आज दिसते आहे.