विवाह हे स्त्री पुरुषांना लैंगिक व्यवहार करण्याचे दिलेले समाजाने, कायद्याने, संस्कृतीने दिलेले लायसन्स आहे
'धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी'. हे वचन विवाहात वराने वधूला द्यायचे असते. हिंदू धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले आहेत. यापैकी 'मोक्ष' हा पुरुषार्थ एकट्यानेच सिद्ध करता येतो, तिथे दुसर्याच्या सहभागाची गरज नसते. परंतु 'धर्म' म्हणजे नितिनियमाने आचरण करणे, 'अर्थ' म्हणजे कुटुंबाच्या गरजा आणि सुखासाठी अर्थोत्पादन आणि त्याचे नियमन करणे आणि 'काम' म्हणजे लैंगिक सुख हे तीन पुरुषार्थ पतीने त्याच्या पत्नीच्या समवेत सिद्ध करायचे असतात. पण हे पुरुषार्थ सिद्ध करीत असताना मर्यादा सोडली जाणार नाही आणि अतिचार होणार नाही याची पतीने काळजी घ्यायची असते. म्हणून आपल्या विवाहाच्या विधीमध्ये पतीने या पूर्ण वाक्याचा उच्चार करून पतीने पत्नीला वचन द्यायचे असते की, धर्म, अर्थ आणि काम यांच्यामध्ये मी अतिचार करणार नाही (न+अतीचरामी).
आपल्याकडे लग्न ठरवताना बहुतांशी पत्रिका/कुंडली पाहिली जाते. प्रेमविवाह ठरत असला तरी त्यात पत्रिकेचा विचार निर्णय घेताना केला जातो. त्यासाठी ज्योतिषाकडून गुणमेलन केले जाते
पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.
पत्रिका-गुणमेलन करताना वधू वरांच्या पत्रिका शेजारी ठेवून त्यातील चंद्र राशी, नक्षत्राच्या आधारे एकूण आठ विभागात गुणांची मांडणी होते. बारा राशींची ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चार विभागात केलेल्या वाटणीला वर्ण म्हणतात. मानव, चतुष्पाद,जलचर,वनचर व कीटक अशा प्रकारे जी विभागणी केली त्याला वश्य म्हणतात. तारा म्हणजे वधू व वर यांचे मधील नक्षत्रात्मक अंतर. योनी म्हणजे नक्षत्रांची केलेली अश्वयोनी, गजयोनी, मार्जारयोनी, मूषकयोनी, अशा एकूण १४ प्रकारे केलेली विभागणी. ग्रहमैत्री म्हणजे राशीस्वामी असणाऱ्या ग्रहांची परस्पर असलेली मैत्री. त्यातून घेतलेले मित्रत्व समानत्व वा शत्रुत्व. गण ही नक्षत्रावरून केलेली देव, मनुष्य व राक्षस या प्रकारात केलेली विभागणी होय. राशी कूट म्हणजे वधूवरांच्या राशीतील परस्पर अंतर. नाडी ही नक्षत्रा नुसार आद्य, मध्य व अंत्य अशा तीन प्रकारात केलेली विभागणी आहे. या विभागांनुसार वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. वर्ण, वश्य, ग्रहमैत्री व राशीकूट हे चार विभाग राशीनुसार पाडले असून त्यांची एकूण १५ गुण होतात. नक्षत्रानुसार तारा,योनी गण व नाडी हे चार विभाग असून त्यांचे एकूण २१ गुण होतात. असे राशी व नक्षत्र मिळून ३६ गुण होतात. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. थोडक्यात पन्नास टक्क्याचेवर मार्क मिळाले तर पास !
आधुनिक विचारांमधे धर्म अर्थ काम व मोक्ष याचे व्यावहारिक निकषांवर, विज्ञानाच्या आधारे, विवेकाच्या आधारे विश्लेषण करुन तारतम्याने विवाहाचा निर्णय घेतला जातो. यासाठी विवाह समुपदेशक मदतील असतात. यातील "काम" हा विचार लैंगिक अनुरुपतेशी संबंधित आहे. ती जर नसेल तर अनेक विवाह घटस्फोटाकडे वाटचाल करतात. लैंगिक अनुरुपतेविषयी उघडपणे बोलणे हे अजूनही सामाजिक अवरोधाचा विषय आहे. पारंपारिक पद्धतीत व्यक्तीची लैंगिक प्रकृती कशी मोजायची? हा प्रश्न होताच. मग तिथे पत्रिकेतील "योनी" गुण ज्याला 0 ते जास्तीत जास्त 4 असे गुण दिले आहेत.
ज्योतिषातील एक विचार पंथ असे म्हणतो कि आमच्या पुर्वजांना लैंगिक सौख्याचे महत्व माहित असल्याने "कामे च " हे धर्मात आले आहे व ती लैंगिक अनुरुपता योनी गुणा तुन पहाता येते
ज्योतिषात योनी चे 14 प्रकार आहेत
अश्व, गज,मेष, सर्प, श्वान,मार्जार,मूषक,गौ,महिषी,व्याघ्र,मृग,वानर,मुंगूस,सिंह हे ते चौदा प्रकार. या प्राण्यांच्या लैगिक प्रकृती,प्रवृत्ती,वर्तन याचा संबंध पत्रिकेनुसार त्या त्या जातकाच्या म्हणजे वधूवरांच्या लैंगिक प्रकृतीशी जोडून त्यातील अनुरुपता शोधायची. उदा. सर्प व मुंगूस यांचे वैर आहे त्यामुळे वधू वर यांचे एकाची सर्प योनी व दुसर्याची मुंगूस योनी येत असेल तर त्याला शून्य गुण. थोडक्यात त्यांची लैंगिक प्रकृती परस्पर विरोधी आहे. अशीच श्वान व मृग, अश्व व महिषि, गौ व व्याघ्र, गज व सिंह,मार्जार व मूषक अशा जोड्यांना शून्य गुण म्हणजे परस्पर विरोधी लैंगिक प्रकृती आहे असा अर्थ काढला जातो. आता वधू वर दोन्ही एकाच योनीचे आहेत जसे की वधू मेष योनी व वरही मेष योनी, वधू अश्व योनी व वरही अश्व योनी तर त्यांना 4 गुण दिले आहेत. म्हणजे त्यांची लैंगिक प्रकृती परस्पर पूरक आहे. त्यांना लैंगिक सौख्य परस्परांकडून उत्तम मिळेल. मेष व श्वान योनी अशी जोडी असेल तर 1 गुण, मेष व अश्व योनी अशी जोडी असेल तर 2 गुण, मेष व गज योनी असेल तर 3 गुण अशा पद्धतीची योनी गुणाची कोष्टके गुणमेलनात असतात.
उत्तर भारतातील ज्योतिषी याचे वेगवगळे अन्वयार्थ काढतात. 0 गुण म्हणजे लैंगिक व्यवहारात 100 टक्के तडजोड,1 गुण म्हणजे, 75 टक्के तडजोड,2 गुण म्हणजे 50 टक्के तडजोड,3 गुण म्हणजे 25 टक्के तडजोड व 4 गुण म्हणजे शून्य टक्के तडजोड तथा लैंगिक सुख अतिशय उत्तम.
आधुनिक कामविज्ञाना मधे तर LGBTQ+ या लैंगिकतेच्या पटामधे विस्तार करुन 47 संज्ञांचा वापर करुन त्यांची लैंगिक प्रकृती विषद केली आहे. कामविज्ञानाचा वारसा सांगणारी शिल्प, साहित्य जरी आपल्या संस्कृती मधे असले तरी त्याचा काळाच्या टप्प्यात संकोच झालेला आढळतो. पुर्वी च्या लग्न पत्रिकेत विवाह ठरला आहे याला अमुक व्यक्तिचा तमुक व्यक्तिशी शरीरसंबंध ठरवला आहे असे उल्लेख आढळत.
कुंडली पाहून माणसाची लैंगिक प्रकृती खरोखरच समजते का? हा प्रश्न उपस्थित केला तर कुठलाही जोतिषी त्याचे ठामपणे उत्तर देउ शकणार नाही. सेक्सॉलॉजिस्ट तरी माणसाचा चेहरा पाहून त्याची लैंगिक प्रकृती सांगू शकतो का? याच ही उत्तर नाही असे आहे. त्याला शारिरीक व मानसिक चाचणी करुन मग ठरवावे लागते. आपण एखाद्याला बायल्या म्हणतो तर एखादीला टॉम बॉय म्हणतो.
"मन सुद्ध तुझं" ही मालिका एबीपी माझावर प्रसारित झाली होती. . त्यातील ॲनिमा ॲनिमस हा भाग व्यक्ती मधील असलेले स्त्री व पुरुष यांच्या अंशाबद्दल भाष्य करतो. यावरुन लैंगिकतेचा कल समजतो.
https://youtu.be/pOdMy-L09Ps?si=cZoHgTV5VpvvaiuU
आताची जेन झी ची पिढी तर लग्नाबद्दल निर्णय घेताना 10 वेळा विचार करते. विवाह हे स्त्री पुरुषांना लैंगिक व्यवहार करण्याचे दिलेले समाजाने, कायद्याने, संस्कृतीने दिलेले लायसन्स आहे हे त्यांना मान्य नाही. कारण फक्त सेक्स साठी विवाह हे कारणच हास्यास्पद आहे. लैंगिक सुखाच्या आनंदासाठी विवाहाची गरजच काय. ते तसेही उपलब्ध आहे. हुकअप, वन नाईट स्टॅंड,लिव्ह इन रिलेशनशिप असे विविध पर्याय सहज उपलब्ध असताना लग्नासारख्या "कमिटमेंट" मधे कोण अडकेल? जेव्हा सहजीवनाची आस/ओढ निर्माण होईल त्या वेळी म्हणजे म्हातारपणी पाहू असा विचार ते करतात.
आता ग्रे डिव्होर्सचे ही प्रमाण वाढत चालले असल्याने वृद्धापकाळात तरी विवाह संस्था टिकतीये का? असा प्रश्न उपस्थित होतो. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे अजून काही पिढ्या जातील. कदाचित तो पर्यंत जैविक रोबोही तयार होतील.