Monday, June 23, 2025

पत्रिकेवरुन स्त्री पुरुषांची लैंगिक अनुरुपता समजते काय?

 


विवाह हे स्त्री पुरुषांना लैंगिक व्यवहार करण्याचे दिलेले समाजाने, कायद्याने, संस्कृतीने दिलेले लायसन्स आहे

 'धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी'. हे वचन विवाहात वराने वधूला द्यायचे असते. हिंदू धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले आहेत. यापैकी 'मोक्ष' हा पुरुषार्थ एकट्यानेच सिद्ध करता येतो,  तिथे दुसर्‍याच्या सहभागाची गरज नसते. परंतु 'धर्म' म्हणजे नितिनियमाने आचरण करणे, 'अर्थ' म्हणजे कुटुंबाच्या गरजा आणि सुखासाठी अर्थोत्पादन आणि त्याचे नियमन करणे आणि 'काम' म्हणजे लैंगिक सुख हे तीन पुरुषार्थ पतीने त्याच्या पत्नीच्या समवेत सिद्ध करायचे असतात. पण हे पुरुषार्थ सिद्ध करीत असताना मर्यादा सोडली जाणार नाही आणि अतिचार होणार नाही याची पतीने काळजी घ्यायची असते. म्हणून आपल्या विवाहाच्या विधीमध्ये पतीने या पूर्ण वाक्याचा उच्चार करून पतीने पत्नीला वचन द्यायचे असते की, धर्म, अर्थ आणि काम यांच्यामध्ये मी अतिचार करणार नाही (न+अतीचरामी).

आपल्याकडे लग्न ठरवताना बहुतांशी पत्रिका/कुंडली  पाहिली जाते. प्रेमविवाह ठरत असला तरी त्यात पत्रिकेचा विचार निर्णय घेताना केला जातो. त्यासाठी ज्योतिषाकडून गुणमेलन केले जाते

पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?

वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा  निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा. 

 पत्रिका-गुणमेलन करताना वधू वरांच्या पत्रिका शेजारी ठेवून त्यातील चंद्र राशी, नक्षत्राच्या आधारे एकूण आठ विभागात गुणांची मांडणी होते. बारा राशींची ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चार विभागात केलेल्या वाटणीला वर्ण म्हणतात. मानव, चतुष्पाद,जलचर,वनचर व कीटक अशा प्रकारे जी विभागणी केली त्याला वश्य म्हणतात. तारा म्हणजे वधू व वर यांचे मधील नक्षत्रात्मक अंतर. योनी म्हणजे नक्षत्रांची केलेली अश्वयोनी, गजयोनी, मार्जारयोनी, मूषकयोनी, अशा एकूण १४ प्रकारे केलेली विभागणी. ग्रहमैत्री म्हणजे राशीस्वामी असणाऱ्या ग्रहांची परस्पर असलेली मैत्री. त्यातून घेतलेले मित्रत्व समानत्व वा शत्रुत्व. गण ही नक्षत्रावरून केलेली देव, मनुष्य व राक्षस या प्रकारात केलेली विभागणी होय. राशी कूट म्हणजे वधूवरांच्या राशीतील परस्पर अंतर. नाडी ही नक्षत्रा नुसार आद्य, मध्य व अंत्य अशा तीन प्रकारात केलेली विभागणी आहे.  या विभागांनुसार वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. वर्ण, वश्य, ग्रहमैत्री व राशीकूट हे चार विभाग राशीनुसार पाडले असून त्यांची एकूण १५ गुण होतात. नक्षत्रानुसार तारा,योनी गण व नाडी हे चार विभाग असून त्यांचे एकूण २१ गुण होतात.  असे राशी व नक्षत्र मिळून ३६ गुण होतात. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे.  हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. थोडक्यात पन्नास टक्क्याचेवर मार्क मिळाले तर पास ! 

आधुनिक विचारांमधे धर्म अर्थ काम व मोक्ष याचे व्यावहारिक निकषांवर, विज्ञानाच्या आधारे, विवेकाच्या आधारे विश्लेषण करुन तारतम्याने विवाहाचा निर्णय घेतला जातो. यासाठी विवाह समुपदेशक मदतील असतात. यातील "काम" हा विचार लैंगिक अनुरुपतेशी संबंधित आहे. ती जर नसेल तर अनेक विवाह घटस्फोटाकडे वाटचाल करतात. लैंगिक अनुरुपतेविषयी उघडपणे बोलणे हे अजूनही सामाजिक अवरोधाचा विषय आहे. पारंपारिक पद्धतीत व्यक्तीची लैंगिक प्रकृती कशी मोजायची? हा प्रश्न होताच. मग तिथे पत्रिकेतील "योनी" गुण ज्याला 0 ते जास्तीत जास्त 4 असे गुण दिले आहेत.

ज्योतिषातील एक विचार पंथ असे म्हणतो कि आमच्या पुर्वजांना लैंगिक सौख्याचे महत्व माहित असल्याने "कामे च " हे धर्मात आले आहे व ती लैंगिक अनुरुपता योनी गुणा तुन पहाता येते

ज्योतिषात योनी चे 14 प्रकार आहेत

अश्व, गज,मेष, सर्प, श्वान,मार्जार,मूषक,गौ,महिषी,व्याघ्र,मृग,वानर,मुंगूस,सिंह हे ते चौदा प्रकार. या प्राण्यांच्या लैगिक प्रकृती,प्रवृत्ती,वर्तन याचा संबंध पत्रिकेनुसार त्या त्या जातकाच्या म्हणजे वधूवरांच्या लैंगिक प्रकृतीशी जोडून त्यातील अनुरुपता शोधायची. उदा. सर्प व मुंगूस यांचे वैर आहे त्यामुळे वधू वर यांचे एकाची सर्प योनी व दुसर्‍याची मुंगूस योनी येत असेल तर त्याला शून्य गुण. थोडक्यात त्यांची लैंगिक प्रकृती परस्पर विरोधी आहे.  अशीच श्वान व मृग, अश्व व महिषि, गौ व व्याघ्र, गज व सिंह,मार्जार व मूषक अशा जोड्यांना शून्य गुण म्हणजे परस्पर विरोधी लैंगिक प्रकृती आहे असा अर्थ काढला जातो. आता वधू वर दोन्ही एकाच योनीचे आहेत जसे की वधू मेष योनी व वरही मेष योनी, वधू अश्व योनी व वरही अश्व योनी तर त्यांना 4 गुण दिले आहेत. म्हणजे त्यांची लैंगिक प्रकृती परस्पर पूरक आहे. त्यांना लैंगिक सौख्य परस्परांकडून उत्तम मिळेल.  मेष व श्वान योनी अशी जोडी असेल तर 1 गुण, मेष व अश्व योनी अशी जोडी असेल तर 2 गुण, मेष व गज योनी असेल तर 3 गुण अशा पद्धतीची योनी गुणाची कोष्टके गुणमेलनात असतात. 

उत्तर भारतातील ज्योतिषी याचे वेगवगळे अन्वयार्थ काढतात. 0 गुण म्हणजे लैंगिक व्यवहारात 100 टक्के तडजोड,1 गुण म्हणजे, 75 टक्के तडजोड,2 गुण म्हणजे 50 टक्के तडजोड,3 गुण म्हणजे 25 टक्के तडजोड व 4 गुण म्हणजे शून्य टक्के तडजोड तथा लैंगिक सुख अतिशय उत्तम.

आधुनिक कामविज्ञाना मधे तर LGBTQ+ या लैंगिकतेच्या पटामधे विस्तार करुन 47 संज्ञांचा वापर करुन त्यांची लैंगिक प्रकृती विषद केली आहे. कामविज्ञानाचा वारसा सांगणारी शिल्प, साहित्य जरी आपल्या संस्कृती मधे असले तरी त्याचा काळाच्या टप्प्यात संकोच झालेला आढळतो. पुर्वी च्या लग्न पत्रिकेत विवाह ठरला आहे याला अमुक व्यक्तिचा तमुक व्यक्तिशी शरीरसंबंध ठरवला आहे असे उल्लेख आढळत.

कुंडली पाहून माणसाची लैंगिक प्रकृती खरोखरच समजते का? हा प्रश्न उपस्थित केला तर कुठलाही जोतिषी त्याचे ठामपणे उत्तर देउ शकणार नाही. सेक्सॉलॉजिस्ट तरी माणसाचा चेहरा पाहून त्याची लैंगिक प्रकृती सांगू शकतो का? याच ही उत्तर नाही असे आहे. त्याला शारिरीक व मानसिक चाचणी करुन मग ठरवावे लागते. आपण एखाद्याला बायल्या म्हणतो तर एखादीला टॉम बॉय म्हणतो.

 "मन सुद्ध तुझं" ही मालिका एबीपी माझावर प्रसारित झाली होती. . त्यातील ॲनिमा ॲनिमस हा भाग व्यक्ती मधील असलेले स्त्री व पुरुष यांच्या अंशाबद्दल भाष्य करतो. यावरुन लैंगिकतेचा कल समजतो.

https://youtu.be/pOdMy-L09Ps?si=cZoHgTV5VpvvaiuU

आताची जेन झी ची पिढी तर लग्नाबद्दल निर्णय घेताना 10 वेळा विचार करते. विवाह हे स्त्री पुरुषांना लैंगिक व्यवहार करण्याचे दिलेले समाजाने, कायद्याने, संस्कृतीने दिलेले लायसन्स आहे हे त्यांना मान्य नाही. कारण फक्त सेक्स साठी विवाह हे कारणच हास्यास्पद आहे. लैंगिक सुखाच्या आनंदासाठी विवाहाची गरजच काय. ते तसेही उपलब्ध आहे. हुकअप, वन नाईट स्टॅंड,लिव्ह इन रिलेशनशिप असे विविध पर्याय सहज उपलब्ध असताना लग्नासारख्या "कमिटमेंट" मधे कोण अडकेल? जेव्हा सहजीवनाची आस/ओढ निर्माण होईल त्या वेळी म्हणजे म्हातारपणी पाहू असा विचार ते करतात.

आता ग्रे डिव्होर्सचे ही प्रमाण वाढत चालले असल्याने वृद्धापकाळात तरी विवाह संस्था टिकतीये का? असा प्रश्न उपस्थित होतो. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे अजून काही पिढ्या जातील. कदाचित तो पर्यंत जैविक रोबोही तयार होतील.


Friday, September 08, 2023

* विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*

 * विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*

वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होउ शकते. वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते. मग गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मानसतज्ञ म्हणजे मुख्यत्वे कौन्सिलर, सायकॉलॉजिस्ट व सायकियाट्रिस्ट, मानसशास्त्राचे प्राध्यापक. कृपया आपल्यापैकी कुणी वा परिचितांमधे कुणी मानसतज्ञ असल्यास कुठलाही पूर्वग्रह वा संकोच न बाळगता माझ्याशी इन बॉक्स, ईमेल वा थेट संपर्क करण्यास विनंती आहे.
प्रकाश घाटपांडे, डहाणुकर कॉलनी, कोथरुड, पुणे
E-mail:- prakash.ghatpande@gmail.com

Monday, September 20, 2021

फलज्योतिष ” शास्त्र? “

 

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच. जीवाजी विद्यापीठ (ग्वाल्हेर), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय (वाराणसी) अशा ठिकाणी तो मानव्यविद्या, प्राच्यविद्या, संस्कृत अशा विषयांतर्गत या ना त्या स्वरूपात अगोदरपासूनच आहे.

Friday, March 26, 2021

भयज्योतिष

 एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते. भविष्यकाळाविषयी सुखद स्वप्ने रंगवणे हा एक मानवी मनाचा खेळ असतो. त्यामुळे जगात बरेचसे व्यवसाय ’भय’ आणि ’स्वप्न’ यावरच चालतात. वैद्यकीय क्षेत्रात आजारी पडण्याचे भय व बरे होण्याचे स्वप्न दाखवून आरोग्य पुरवण्या ’प्रबोधनाचे’ तथा ’जागरुकतेचे’ काम करतात. बिल्डर घराचे स्वप्न दाखवतो. पोलिस,वकील कायद्याचे भय दाखवतात. बॉलिवूड तर अनेकांना हिरो हिरॉईन बनण्याचे स्वप्न दाखवते. लठ्ठ स्त्रियांना झिरो फिगर करण्याचे स्वप्न व सडपातळ स्त्रियांना लठ्ठ होण्याचे भय दाखवून देखील ब्युटी, डाएट, जिम इंडस्ट्रीज चालतात. ज्योतिषात ही तशा प्रकारचे लोक आहेत. कालसर्प योगाचे भय दाखवून नारायण नागबली विधी करायला लावणारे भरपूर पैसे उकळणारे लोक आहेतच. त्याचबरोबर काळजी करु नका कुलदेवतेच स्मरण करा व आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा असे सांगून धीर देणारे ज्योतिषी देखील आहेत. ग्रहपीडेचे भय आणि परिहार वा तोडगा काढून त्याचे निवारण केल्याने चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवून जातकाला दिलासा दिला तर त्यालाही लुबाडल्यासारखे वाटत नाही हे धूर्त व  चाणाक्ष ज्योतिषांना माहित असते.

Monday, March 16, 2020

डॉ. ह वि सरदेसाई

डॉ ह. वि सरदेसाईं गेले. त्यांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांचे लेख, व्याखाने मी ऐकायचो. त्यांच्या एका लेखात जवळपास 70 टक्के आजार हे सायकोसोमॅटिक असतात असे एक विवेचेन होते. मला जरा विचित्र वाटल. जरा फारच होतय नाही? असे वाटून गेले. नंतर यांचे फलज्योतिष विषयासंबंधी काय विचार आहेत हे जरा समजून घ्यावेत म्हणुन मी त्यांच्याकडे साधारण 2016 च्या दरम्यान गेलो होतो. त्यांच्या कमला नेहरु पार्कजवळील क्लिनिक वर गेलो. काउंटरवर सांगितले कि मी रुग्ण म्हणून आलेलो नाही. मला सामाजिक विषयासंदर्भात त्यांची भेट घ्यायची आहे. मला काउंटर वर सांगितले की सध्या ते वृद्धापकाळ व प्रकृतीअस्वास्थ्यामुळे या विषयापासून दूर आहेत. कार्यक्रमांना जात नाहीत. मी म्हणालो त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यांनी नाही म्हणून सांगितले. मग म्हणल ठिक आहे. ही पुस्तके त्यांना वाचायला द्या असे म्हणून माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद व यंदा कर्तव्य आहे अशी दोन पुस्तके व डॊ जयंत नारळीकरांनी लिहिलेले ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... चे लोकसत्तातील तेव्हाचे परिक्षण असे दिले. माझे कार्डही दिले. नंतर मी माझ्या रुटीनला लागलो. चार पाच दिवसांनी मला त्यांच्या स्वागतकाचा फोन आला. डॉ. तुम्हाला भेटू इच्छितात. सकाळी दहा वाजता या. मला आनंद वाटला. मी लगेच गेलो. त्यांनी स्वागत केल. तुमची दोन्ही पुस्तके व्यवस्थित वाचलीत असे सांगितले. पुस्तके आवडल्याचे सांगितले तसेच तुमच्या विवेचनाशी सहमत असल्याचेही सांगितले. मग अनौपचारिक व ऐसपैस गप्पा झाल्या. मी ज्योतिशातले काही वैद्यकशास्त्रा संबंधी किस्से सांगितले. मग मी तो सायकोसोमॅटिकवाला विषय हळूच काढला.  मला स्वत:ला IBS ( irritable bowel syndrome) चा त्रास डिटेक्ट झाला असल्याचे सांगितले. या IBS वर त्यांचा फॅमिली डॉक्टर पुरवणीत त्यांचा लेख आला होता. त्या त्रासात सायकोसोमॆटिक भाग आहे. हे त्या लेखातही होते. मी त्याविषयी विचारले. तुमच्या विवेचनात 70 टक्के भाग सायकोसोमॅटिक चा उल्लेख असतो. ते म्हणाले कि माझ्याकडे इतक्या वर्षात जे पेशंट आले त्यावरुन मी हे सांगतो. प्रत्यक्षात हे प्रमाण त्याही पेक्षा जास्त आहे. मनाचा व शरीराचा फार जवळचा व गुंतागुंतीचा संबंध आहे.आपल्याला त्याचे सगळेच आकलन झाले आहे असे अजिबात नाही. आम्ही पेशंटला फक्त बर व्हायला मदत करतो. त्याचा तोच बरा होत असतो. अनेक मनोकायिक आजारात प्लासिबो परिणाम होत असताना दिसतो. काही आजार निश्चित असे आहेत की जिथे औषधांचाच परिणाम होतो. आणि कारणही मनोकायिक नसतात. पण असे त्यामानाने फार कमी. मी म्हणालो औषधं जान्हवी तोयं। धन्वंतरी म्हणुन रोग्याचा असलेला विश्वास महत्वाचा आहेच. हल्ली डॉक्टर पेशंट नात बदलतयं. मग गाडी परत ज्योतिषावर आणली. त्यांना तो मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांविषयी आम्ही केलेला प्रयोग सविस्तर सांगितला. त्यांना प्रयोगाचे कौतुक वाटले त्यांनी पेपर मधे साधारणपणे तो वाचला होता.मी त्यांना म्हटल कि अंनिसचे ज्योतिषांना आव्हान हे नेहमीच आहे. पण हा प्रयोग आम्ही आवाहन या पातळीवर केला. आव्हानात दंभ उन्मादाचा वास येवू शकतो. आवाहनात ’आपण’ असा एक मृदू भाग असतो. मग मी त्यांना माझा फलज्योतिषविषयक प्रवास सांगितला. फलजोतिषाविषयी असलेला एक मृदूकोपरा त्यांना भावला. कदाचित याच कारणामुळे त्यांची माझी ही अनौपचारिक ऐसपैस भेट झाली असावी. नंतर आम्ही परस्परांचा निरोप घेतला त्यांची माझी ती पहिली व शेवटची भेट.

Monday, April 01, 2019

नरेंद्र मोदींची खरी जन्मकुंडली कोणती?

मूळात नरेंद्र मोदींची खरी जन्मतारीख कुणालाच माहित नाही. निवडणुक आयोगाकडे असलेल्या कागदपत्रानुसार ती आहे 17 सप्टेंबर 1950. पुढे जन्म ठिकाण वीसनगर, गुजरात सकाळी 11 वाजता ही जन्मकुंडली तयार करण्यासाठी लागणारी अतिरिक्त माहिती. बहुसंख्य ज्योतिषी ही माहिती खरी आहे असे गृहीत धरुन जन्मपत्रिका तयार करतात. त्यानुसार त्यांची राशी व लग्न दोन्ही येते वृश्चिक. आता त्यांची दुसरी जन्मतारीख आहे 29 ऑगस्ट 1949  सकाळी 6 वाजता. ही आहे त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरील तारीख. बीबीसी ने दिलेल्या माहिती नुसार निवडणुक आयोगाला जी माहिती दिली आहे त्या नुसार मोदींनी 1967 साली एसएससी परिक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर 1978 मधे दिल्ली विश्वविद्यालयातून बीए उत्तीर्ण केले नंतर 1983 मधे गुजराथ युनिवर्सिटीतून एम ए राज्यशास्त्र केले. परंतु अजुन कोणी त्यांचे सर्टिफिकेट पाहू शकला नाही. अर्थात त्याने काही फरक पडत नाही ही गोष्ट वेगळी. त्यांच्या 29 ऑगस्ट च्या जन्मतारखे नुसार त्यांची रास येते तूळ व लग्न येते सिंह. वाय सी शुक्ल या ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार दोन्ही पत्रिकेचा अभ्यास करुन अधिकृत जन्मतारखेनुसार येणार्‍या कुंडली पेक्षा त्यांची दुसरी जन्मतारीख 29 ऑगस्ट नुसार येणारी कुंडली ही अधिक योग्य वाटत आहे. ज्योतिषात याला अनुमानित पत्रिका म्हणतात. म्हणजे ताळा पद्धतीने आताची जातकाची वैशिष्ट्ये, वर्तमान व जन्मपत्रिका यांची सांगड घालून ठरवणे.
 खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, जत्रच्या टायमाला, ऐतवार व्हता तव्हा, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" सवसांच्या टायमाला अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून  जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते. जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारखेच्या नोंदी सुद्धा जिथ विश्वासार्ह मिळणे अवघड तिथे ज्योतिषाचा मूलभूत आधार व हत्यार असलेल्या जन्मकुंडलीची विश्वासार्हता काय असणार आहे? मग अशावेळी अशा जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का? असो! आमचे रिसबूड म्हणायचे बंडूचा हातचा चुकला तरी बंडूच गणित कस काय बरोबर येत?

Thursday, October 18, 2018

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.
बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :